मोंगल घराणें
मोंगल घराणें
विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोंगल घराणें - दिल्लीस राज्य करणारें शेवटचें मुसुलमानी घराणें मोंगल वंशाचें होतें. त्याचा संस्थापक बाबर हा चेंगीजखान या प्रसिद्ध मोंगल राजाच्या वंशांतील होता. या घराण्यानें सन १५२६-१८५८ पर्यंत दिल्लीच्या गादीचा व पर्यायानें हिंदुस्थानच्या बादशाहीचा उपभोग घेतला. यांत बाबर (१५२६-१५३०), हुमायून (१५३०-१५४० व १५५५-१५५६), अकबर पहिला (१५५६-१६०५), जहांगीर (१६०५-१६२७), शहाजहान (१६२७-५८), औरंगझेब (सन १६५८-१७०७), बहादुरशहा पहिला (१७०७-१२), जहांदरशहा (१७१२-१३), फर्रुखसीयर (१७१३-१९), महंमदशहा (१७१९-४८), अहंमदशहा (१७४८-१७५४), अलमगीर दुसरा (१७५४-१७५९), शहाअलम (१७५९-१८०६), अकबर दुसरा (१८०६-३७) आणि बहादूरशहा दुसरा (१८३७-५८) असे एकंदर १५ पुरुष गादीवर बसले. त्यांपैकीं बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगझेब, जहांदरशहा, अहंमदशहा यांचीं चरित्रें त्यांच्या नांवाखालीं दिलीं आहेत. बाकीच्यांचीं येथें थोडक्यांत देतों.
प हि ला ब हा दू र श हा.- हा औरंगझेबाचा वडील मुलगा, मूळ नांव मूअज्जम उर्फ शहाअलम. औरंगझेब मेला तेव्हां हा काबूलकडे होता; तिकडून परत येतां येतां त्यानें रजपुतांची मदत घेऊन आपल्या दुसर्या भावास (अजीम) लढाईंत ठार करून व बहादूरशहा हें नांव घेऊन गादी बळकाविली. नंतर दक्षिणेंत येऊन शाहु राजे यांचें स्वातंत्र्य कबूल करून त्यांचें सख्य जोडलें व कामबक्ष नांवाच्या दुसर्या भावास ठार केलें. याच्या कारकीर्दींतील मुख्य गोष्ट शीख लोकांची मुसुलमानांविरूद्ध उचल ही होय; त्यास कारण औरंगझेबानें त्या धर्माचा अतिशय छळ केला हें होय. औरंगझेब मेल्यावर त्याचा सूड शिखांनीं घेतला. बंदा नांवाचा शिखांचा गुरु होता; त्याच्या आज्ञेनें त्यांनीं मोंगली राज्यांत धुमाकूळ घातला, मशिदी फोडल्या, शहरें ओस पाडलीं व प्रेतें उकरून पशूंस खावयास दिलीं. तेव्हां बहादुरनें त्यांच्यावर सैन्य पाठविलें, पण शिखांचा बंदोबस्त होण्यापूर्वींच बहादुर मरण पावला. याच्या अंगीं धाडस नसून हा शांत होता.
फ र्रु ख सी य र.- बहादुरचा मुलगा जहांदर हा क्रूर व दूर्व्यसनी असल्यानें, त्याचा पुतण्या फर्रुखसीयर यानें त्याचा खून करून गादी बळकाविली. या कामांत त्याला सय्यदबंधूंचें साहाय्य झाल्यानें त्यांपैकीं अबदुल्ला यास त्यानें वजीर व हुसेन यास सेनापति नेमिलें. ही कारकीर्द सय्यद बंधूंचीं कारस्थानें या नांवानें प्रसिद्ध आहे. यावेळीं रजपूत राजांनीं एक होऊन मोंगलांचा अंमल बराचसा झुगारून दिला. पुढें शहाला सय्यदांचा ताबा दु:सह होऊन तो त्यांच्या नाशाची खटपट करूं लागला, पण ती उलट शहाच्याच गळ्यांत आली. शहानें हुसेन यास दक्षिणच्या सुभेदारीवर पाठविलें असतां, त्यानें मराठ्यांशीं सख्य करून व त्यांची फौज घेऊन दिल्लीवर चढाई केली. पुढें दोघांभावांनीं शहास ठार करून लागोपाठ दोन इसम गादीवर बसविले, म्हणून त्यांनां किंगमेकर्स (राजा बनविणारे) असें म्हणतात. शेवटीं त्यांनीं स. १७१९ त महंमदशहा नांवाच्या फर्रुखसीयरच्या चुलत भावास गादीवर बसविलें. फर्रुखनें इंग्रज कंपनीस बराच मुलुख दिला होता. त्यानें शिखांवर स्वारी करून त्यांची फार कत्तल केली; बंदा व त्याचे सांथीदार यांचा क्रूरपणें वध केला. त्यामुळें शिखांनीं तीस वर्षें कांहीं गडबड केली नाहीं.
म हं म द श हा.-हा पहिल्या बहादुरशहाच्या खुजिस्ताअख्तार नांवाच्या मुलाचा मुलगा. यानें युक्तीनें सय्यदांचा पाडाव केला. याच्या अंगीं कर्तृत्व नव्हतें, हा ऐषारामांत निमग्न असल्यानें त्याच्या वेळीं मोंगल बादशाहीचे तुकडे होऊं लागले. दक्षिणेंत निजाम स्वतंत्र बनला, तेव्हां त्याच्या नाशाची खटपट शहानें केली, पण ती फसली. महंमदाच्या कारकीर्दींत मराठ्यांनीं गुजराथ, माळवा, वर्हाड वगैरे प्रांत जिंकून थेट दिल्लीवर चढाई केली, तेव्हां शहानें त्यांच्या सर्व मागण्या कबूल केल्या. इतक्यांत नादीरशहानें स्वारी करून महंमदास ५८ दिवस कैदेंत ठेविलें व ३० कोटींपर्यंत लूट नेली. सिंधूच्या पश्चिमेकडील मुलुख नादीर शहानें घेतला, राजपुताना स्वतंत्र बनला, नादीरच्या स्वारीचा फायदा घेऊन शीख पुन्हां उठले व त्यांनीं पंजाब घेतला. मुर्शीदकुलीनें बंगाल्यांत स्वतंत्रता धारण केली, आणि मराठ्यांनीं तर दिल्लीच ताब्यांत घेतली. याप्रमाणें महंमदच्या कारकीर्दीत मोंगली साम्राज्य ढासळून पडलें. महंमद हा स. १७४८ त मेला.
दु स रा अ ल म गी र.-हा जहांदरशहाचा मुलगा, याला गाजीउद्दीन या वजिरानें स. १७५४ त गादीवर बसविलें, व सर्व कारभार स्वत:च्या हातीं घेतला. गाजीस मराठ्यांचा पाठिंबा असून ते दिल्लीस ठाणें घालून बसले होते, एवढेंच नव्हे तर पर्यायानें मराठेच मोंगली बादशाहीचा कारभार करीत होते. त्यामुळें रोहिले व इतर मुसुलमान हे मराठ्यांविरुद्ध बनून त्यांनीं अब्दालीस हिंदुस्थानांत बोलाविलें. त्यानें स. १७५७ त स्वारी करून दिल्ली करून दिल्ली व मथुरा लुटली व नजीबखानास वजिरी देऊन पंजाब खालसा केला. तेव्हां तो परत घेण्यासाठीं मराठ्यांनीं स्वारी करून अब्दालीच्या मुलास तेथून हांकलून दिलें. त्यावर अब्दालीनें पुन्हां १७५९ सालीं स्वारी केली. या धामधुमींत अलमगीरचा खून झाला.
श हा अ ल म.-हा दुसर्या अलमगीरचा मूलगा; मूळचें नांव अलीगोहर. बापाच्या वेळच्या धामधुमींत वजीर आपल्यास पकडील या भीतीनें हा बंगाल्यांत पळून जाऊन इंग्रजांच्या आश्रयाला राहिला होता. बापाच्या खुनानंतर त्यानें शहाअलम नांव घेऊन बादशाहीपद धारण केलें; परंतु दिल्ली त्याच्या ताब्यांत नव्हती, तेथें रोहिल्यांचें प्राबल्य होतें. इंग्रज, अयोध्येचा नबाव व मराठे हे तिघेहि शहास आपल्याकडे ओढण्याची खटपट करीत होते परंतु जो आपल्याला दिल्लीच्या तख्तावर बसवील त्याच्या आश्रयानें आपण राहूं असें त्याचें म्हणणें होतें. तो अलाहाबादेस इंग्रजांजवळ असतां त्यानें बंगाल, बहार व ओरिसा या प्रांतांच्या वसुलांतून सालीना २४ लाखांची नेमणूक घेऊन इंग्रज कंपनीस बंगालप्रांताची दिवाणी सनद दिली (१७६५). तरीहि ज. स्मिथच्या नजरकैदेंत तो होता. शेवटीं मराठ्यांनीं त्याला दिल्लीस आणलें (१७७०). या सुमारासच मराठ्यांचा शत्रु नजीबखान रोहिला मेला; त्याच्या मागें त्याचा मुलगा झाबितखान हा शहाचा वजीर बनला. झाबिताचा पुत्र गुलामकादर यानें शहावर उठून दिल्लीस अनन्विक कृत्यें केलीं. बादशहास व त्याच्या कुटुंबांतील बायकामुलांस लाथांनीं व चाबकांनीं बेदम मारून, त्यानें वृद्ध शहाचे डोळे काढले (१७८८). अखेर शहानें महादजी शिंद्याची मदत घेऊन गुलामाचा वध करविला. तेव्हांपासून बादशहा व सर्व मोंगली साम्राज्य मराठ्यांच्या हातीं गेलें; तें १८०३ मध्यें इंग्रजांनीं मराठ्यांचा पराभव करून आपल्या ताब्यांत घेतलें व या वृद्ध, अंध व दुर्दैवी बादशहास नेमणूक करून दिली याप्रमाणें मोंगल बादशाहीचा अंत झाला. शहाअलम हा १८०६ मध्यें ८६ वर्षांचा होऊन मरण पावला. तो सज्जन व पापभीरू होता.
अ क ब र दु स रा व ब हा दु र दु स रा.- शहाअलमचा मुलगा अकबर हा इंग्रजांकडून नेमणूक घेऊन बादशहा या नांवानें दिल्लीस रहात असे, तो स. १८३७ त मेल्यावर त्याचा मुलगा महंमद बहादुरशहा याच्याकडे नेमणूक (दरमहा एक लाख रु.) चालू होती. तो व त्याचे मुलगे १८५७ सालच्या नानागर्दींत सामील झाले, असा त्यांच्यावर आरोप ठेवून इंग्रजांनीं दिल्ली काबीज केली आणि बादशहाच्या दोन मुलांस व एका नातवास ठार मारिलें व खुद्द बादशहास रंगून येथें कैदेंत ठेविलें. हा बादशहा उत्तम कवि होता. याप्रमाणें मोंगल घराण्याचा अंत झाला.
या घ रा ण्या च्या वे ळ ची सा मा न्य स्थि ति.-या घराण्याच्या राजवटींत अनेक पाश्चात्त्य प्रवासी हिंदुस्थानांत आले होते; त्यांच्या लेखांवरून त्या वेळची बरीच माहिती समजते. धान्य, कापूस, नीळ, लोंकर, रेशीम हे व्यापाराचे मुख्य जिन्नस होते. कापूस, रेशीम व लोंकर यांचीं उत्तम व तलम वस्त्रें येथें तयार होत. धनधान्याची समृद्धि असून लोकांच्या गरजा येथेंच भागत. परदेशी व्यापारी रोख पैसा भरून येथील माल नेत. हिंदुस्थानांतील पैसा बाहेर नेणें हा मोठा गुन्हा समजला जात असे. थिव्हेनॉट, फ्रायर, हॅमिलटन वगैरे प्रवाशांनीं तर असें म्हटलें आहे कीं, “त्यावेळीं पाश्चात्त्य राष्ट्रांपेक्षां हिंदुस्थानची स्थिति फार चांगली होती.” पुढें पुढें मोंगलांच्या सत्तेंत अव्यवस्था माजली. तरीहि टॅव्हर्नियरच्या मतें “हिंदुस्थानांतील प्रवास जितका सोयीचा व सुलभ आहे तितका फ्रान्स किंवा इटलीमध्यें नाहीं.” मोंगली राज्याचा वसूल मुख्यत: जमीनबाब व जकातीचा असे. संकटप्रसंगीं शेतकर्यांस सार्याची सूट मिळे. बादशहाचे मामूल हक्क पुष्कळ असत यावेळीं संस्कृतांत निरनिराळ्या विषयांवर बरीच ग्रंथरचना झाली. जगन्नाथपंडीत, अप्पया दीक्षित, मम्मट, जयदेव वगैरे विद्वान् यावेळीं होऊन गेले. मुसुलमानी ग्रंथकारांस मात्र विशेष उत्तेजन मिळे; उर्दू व फारशी भाषेस राजमान्यता असल्यानें कांहीं हिंदु लोकांनींहि त्या भाषांत ग्रंथ लिहिले. टपालासाठीं डांकवाले व स्वार असत. सुरत, मच्छलीपट्टण इत्यादि बंदरें व्यापारासाठीं प्रसिद्ध होतीं. वहातुकीचे रस्ते मोठमोठे होते व मार्गांत धर्मशाळा, सराया वगैरे सुखसोयी होत्या. मोठ्या लोकांचीं घरें नक्षीचीं व भव्य असत. विशिष्ट कामगिरीसाठीं सरकारकडून पदव्या, जहागिरी वगैरे मिळत. कलाकौशल्य भरभराटींत असून त्याचे नमुने यूरोपीय लोक स्वदेशीं नेत. देशांत संपत्ति विपुल होती.
वरीलप्रमाणें मोंगली राज्याची स्थिति असतां त्यांचा नाश कसा झाला याचीं टोकळ कारणें पुढीलप्रमाणें होत:-एक दोन अपवाद सोडून बाकींच्या बादशहांची जुलमी राज्यव्यवस्था; हिंदूंचा छळ; वारसाचा निर्बंध नसल्यामुळें उद्भवलेले गृहकलह; नादीरशहा, अब्दाली इत्यादि परकीयांच्या स्वार्या; शीख, रोहिले, जाट, रजपूत यांचा स्वतंत्र प्रयत्न; मराठ्यांनीं बादशाहीचें केलेलें आक्रमण; दक्षिणेतील मुसुलमानी राज्यांचा नाश मोंगलांनींच केल्यामुळें निष्कंटक बनलेलें मराठी राज्य व औरंगझेबानंतर झालेले बादशहा दुर्बल असणें. इ. [ बील; एलफिन्स्टन; कीन-फॉल ऑफ धि मोंगल एंपायर. ]
Comments
Post a Comment